स्वप्नांच्या दुनियेत

 स्वप्नांच्या दुनियेत

श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्यावर थंड वाऱ्याची झुळूक त्यांच्या स्वागताला धावली. हवा हलकीशी गारठलेली, पण सूर्यप्रकाशात सोनसळी होती. हातात हात गुंफलेले, ते टूर गाइड अब्दुलसोबत त्यांच्या हॉटेलकडे निघाले.

रस्त्यांवर लांब लांब झाडांच्या रांगा, साऱ्या बाजूंनी डोंगरांची मांदियाळी आणि मधूनच डोकावणारे छोटे छोटे झोपडीसदृश घरं. हे सगळं श्रेयाच्या डोळ्यांमध्ये झळकत होतं.

हॉटेलच्या खोलीतून दिसणारा डल लेक… कार्तिकने तिला दृश्य दाखवले, “ही फक्त सुरुवात आहे.” ती गालातल्या गालात हसली. जगाचं भान हरवावं, असंच सारं. जणू स्वर्गच. आपण स्वर्गात आहोत असंच त्या दोघांना वाटत होते.

रात्री, गरम कहवा (कश्मिरी चहा) आणि गरम कपडे ओढत थोडं थोडं थंडीपासून संरक्षण करत त्यांनी पहिला दिवसाचा आनंद घेतला. श्रेयाने लिहिलं डायरीत – “पहिल्या दिवसानेच मन हरवलंय.”

दुसऱ्या दिवशी ती दोघं डल लेकच्या मिठीतच हरवली. सकाळीच अब्दुलने शिकाऱ्याचं बुकिंग केलं होतं. पाण्यावर तरंगणारी रंगीबेरंगी फुलं, छोट्या दुकानांच्या होड्या आणि शिकाऱ्यांची शांत सरसर चाल. डल लेकवर कार्तिकने एक सुंदर कविता केली. जवळच्या दुकानातून गुलाब विकत घेतला आणि श्रेयाला दिला. “तुला पाहिलं, तेव्हापासून माझं जग फुललं,” त्याने कवितेची एक एक ओळ म्हणत असताना श्रेयाने ती खोलवर असलेल्या आपल्या हृदयात साठवली. खरंच सुख म्हणजे तरी नक्की काय? हेच तर सुख. आपल्याला जपणारा जोडीदार अन् अशी निसर्गाची साथ. कार्तिकही जणू तिच्या गुण आणि रुपावर भाळला होता. लग्न जमल्यापासून त्याला श्रेया शिवाय काही सुचत नव्हतं. आता तर जणू ती परी सोबत आहे अन् आपण राजकुमार आहोत असंच त्याला वाटत होतं.

शिकाऱ्याच्या झुलत्या घरात रात्री मुक्काम करताना, पाण्याच्या लहरींमध्ये प्रेमाच्या लहरी मिसळल्या. बाहेर संथ लाटांची गाणी, आत दोन जीवांची धडधडती गाणी.

रात्री, चांदण्याखाली त्यांनी वचन दिलं -“ते कधीही एकमेकांना सोडणार नाहीत.”

दुसऱ्या दिवशी गुलमर्गचा प्रवास पहाटेच सुरू झाला. स्नो गोंडोला (केबल कार) मध्ये चढताना, श्रेयाने कार्तिकचा हात घट्ट पकडला.

वर पोहोचल्यावर त्या बर्फाच्या महासागरात उडी मारली. हातात हात घेत थंडीच्या प्रवाहाला चकवा देत, ते दोघेही लहान मुलांसारखे खेळत होते. कार्तिकने श्रेयावर बर्फाचा गोळा फेकला. हसत हसत तिनेही प्रत्युत्तर दिलं. दोघांचे गाल लालीने फुलले.

एका छोट्या टी स्टॉलमध्ये बसून गरम कहवा (चहा)घेताना श्रेयाने कुडकुडत म्हटलं, “जग थंड असेल, पण तुझा हात गरम आहे.” कार्तिकने तिचे हात आपल्या हातात घेतला आणि उत्तर दिलं, “मी कायम तुझ्या सोबत राहून तुला प्रेमाची ऊब देईन.” त्यांचा प्रत्येक दिवस गुलाबी प्रेमात कसा उगवत आणि मावळत होता. हे तर त्या दोघांनाही कळत नव्हते. 

“आज काहीतरी हटके करायचंय,” श्रेयाने सकाळीच ठरवलं.

अब्दुलच्या मदतीने ते एका छोट्याशा गावात पोहोचले. एका वृद्ध काश्मीरी दांपत्याने त्यांना जेवणासाठी बोलावलं.

मातीच्या चुलीवर बनलेला दम आलू, नाद्रू यखनी, (कमळाच्या दांड्याची मसालेदार भाजी)आणि घरगुती कहवा(चहा)… अतिथ्य इतकं प्रेमळ होतं की श्रेयाचा गळा दाटून आला.

“तुम्ही आमचे पाहुणे नाही, आमचे आप्त आहात,” त्या आजोबांनी म्हटलं.

त्यांचं साधं घर, त्यांच्या डोळ्यातली आपुलकी, आणि ताटात वाढलेलं प्रेम… कार्तिक आणि श्रेया यांच्या आठवणीत कायमचं कोरलं गेलं.

दुपारी गावातल्या छोट्या छोट्या मुलांबरोबर क्रिकेट खेळताना दोघांनी खरंखुरं जग अनुभवलं.

 तसं त्यांना इथे येऊन आता चार दिवस पूर्ण झाले होते. 

“आज का एवढं शांत वाटत आहे?” श्रेयाने विचारलं, बाजारात उतरल्यावर त्यांनी पाहिलं रस्त्यावर सैन्यदलाचं प्रमाण वाढलेलं होतं. दुकानदार तणावात दिसत होते. काही शटर अर्धवट उघडलेले.

“काहीतरी गडबड आहे,” अब्दुलने कुजबुजून सांगितलं.

तेवढ्यात दूरवरून सायरनचे आवाज आले. हळूहळू रस्त्यावरची वर्दळ गायब होऊ लागली.

श्रेयाने कार्तिकचा हात घट्ट पकडला. “चला, इथून निघू,” ती घाबरत म्हणाली.

जवळचं एक दुकान बंद होतं, तेव्हढ्यात एक भेदरलेला दुकानदार म्हणाला, “लवकर जा साहब, काहीतरी होणार आहे.”

हॉटेलपर्यंत पोहोचताना त्यांच्या पावलांचा आवाजही त्यांना मोठा वाटत होता.

रात्रीच्या जेवणात अब्दुलने सांगितलं, “काही दहशतवादी हालचालींच्या बातम्या आहेत. उद्या विमान पकडून निघून जा.”

सकाळीच त्यांनी चेकआऊट केलं. बाहेरचे आवाज गडगडाटी होते.

हॉटेल व्यवस्थापकाने सूचना दिली, “विमानतळाच्या दिशेने जायचं, पण मुख्य रस्ता सोडून.”

हातात फक्त एक बॅग. कार्तिक आणि श्रेया अब्दुलसोबत एका छोट्या गल्लीतून पळत  चालले.

तेवढ्यात मागे स्फोटाचा मोठा आवाज झाला. जमिन हलली.

श्रेयाने किंचाळत कार्तिकला मिठीत लपेटलं. धुराचे ढग त्यांच्या डोळ्यासमोर धावत होते.

एका मोडकळीस आलेल्या भिंतीच्या आडोशाला थांबून त्यांनी श्वास घेतला. कार्तिकने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, “घाबरु नकोस… मी आहे ना.”

अब्दुलने इशारा केला – “चला, लवकर!”

गल्ल्यांमधून धावत, पळत, वळणं घेत, ते एका सैनिकी वाहनापर्यंत पोहोचले. सैनिकांनी त्यांची ओळख पटवून गाडीत बसायला सांगितलं.

गाडीत बसल्यावर श्रेयाने कार्तिककडे पाहिलं. त्याचे कपाळ घामाने ओलेचिंब झाले होते.. पण डोळ्यात फक्त एक भावना तिला सुरक्षित ठेवण्याची होती.

विमानतळावर पोहोचल्यावर, तपासण्या आणि गोंधळ पार करत ते विमानाच्या दिशेने धावले.

विमान उंच भरारी घेत असताना, श्रेयाने खिडकीतून खाली पाहिलं. स्नो-कॅप्ड डोंगर, हिरव्या वाटा, डल लेक… आणि थोडं दूर, धुराचे लोट. डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले.

कार्तिकने तिच्या हातावर आपला हात ठेवला. “हे सगळं आपण सोबत पार केलं. आता आयुष्याचं प्रत्येक वादळालाही सोबतच तोंड देऊ.”

ती हसली. डोळ्यांतून अश्रू ओघळत असतानाही ते हसू आश्वासक  होतं.

विमानाने आकाशात उंच झेप घेतली. आणि मागे उरल्या फक्त आठवणी – सुंदर, वेदनादायक, आणि अविस्मरणीय.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!