शर्वरीने आरशात पाहिलं. तिच्या डोळ्यांत चमक होती. नवीन स्वप्नांची, काहीतरी मोठं करण्याची. ती आणि शमिका कॉलेजच्या गेटबाहेर बसल्या होत्या.
“पत्रकारितेमध्ये तुझं नाव होईल बघ,” शमिका म्हणाली.
“बघू या! मला समाजात बदल घडवायचा आहे. आपल्या लेखणीने आवाज द्यायचा आहे,” शर्वरी म्हणाली, तिचे डोळे उत्साहाने चमकले.
त्या दोघींच्या डोक्यात मोठी स्वप्नं होती. त्या दोघीचं बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं होतं, पण स्वप्नं मात्र मोठी होती.
शर्वरीने घरी येऊन सांगितलं, “माझी इंटर्नशिप एका नामांकित वृत्तपत्रात लागली आहे!”
तिच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता.
“बाळा, हे करिअर ठीक आहे, पण शेवटी संसारच महत्वाचा. वेळेत लग्न झालं पाहिजे.”
शर्वरीने काहीसं नाराज होऊन पाणी प्यायचं सोंग केलं. पण तिच्या मनात विचार घोळत राहिले—स्त्रीचं आयुष्य फक्त लग्न आणि संसारापुरतंच मर्यादित असतं का?
शर्वरीचं लग्न राजूशी ठरलं. तो सरकारी नोकरीत होता. तिच्या आई-वडिलांच्या मते तो “सेटल” होता.
लग्नाच्या सुरुवातीला सगळं ठीक होतं. राजू शांत, जबाबदारी घेणारा वाटला.
पण काही महिन्यांतच शर्वरीला जाणवलं की संसार ही फक्त एक जबाबदारी होती. तिच्या जगण्याला आता ठरलेला चौकट मिळाली होती.
सकाळी उठलं की स्वयंपाक, सासू-सासऱ्यांची कामं, नवऱ्याचे डबे तयार करणं, संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक. तिच्या आवडी, तिचं लेखन, तिचं जगणं कुठेतरी गडप झालं.
एका दुपारी तिला शमिकाचा फोन आला.
“शर्वरी! माझा पहिला मोठा रिपोर्ट प्रसिद्ध झाला! एका मोठ्या आंदोलनाचं कव्हरेज केलंय मी!”
शर्वरीला आनंद झाला, पण तिच्या आत कुठेतरी वेदना दाटून आल्या. तिने कधी नव्हे ते नकळत सुस्कारा टाकला.
“तू लिहायला सुरुवात केलीस का?” शमिकाने विचारलं.
“वेळच मिळत नाही गं… घरातलं सगळं सांभाळायचं असतं ना.”
“तू वेळ शोधला पाहिजे! तुझं लेखन म्हणजे तुझं अस्तित्व आहे.”
शर्वरीला ते उमजत होतं, पण तरीही तिला वाटत होतं की नवऱ्याच्या, सासू-सासऱ्यांच्या विरोधात जाऊन काही करायला तिला संधी नाही.
त्या रात्री राजू ऑफिसमधून आला. तिने त्याच्याशी बोलायचं ठरवले.
“राजू, मला एका वृत्तपत्रात लेखनाची संधी मिळतेय. मी लिहायला सुरुवात करु का?”
राजूने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, “कशाला? घरात कमी आहे का तुला काही? तुला नोकरी करण्याची गरज नाही.”
शर्वरी सुन्न झाली. “पण हे माझं स्वप्न आहे…” ती हळूच पुटपुटली.
राजूने कपडे बदलत म्हणला, “बायकांनी घर सांभाळावं. तुला एवढं कशाचं टेन्शन आहे?”
शर्वरी गप्प झाली. तिच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं.
त्या रात्री शर्वरी छताकडे बघत विचार करत होती. “हेच का माझं आयुष्य? मी खरंच फक्त एक पत्नी आणि सून आहे? माझी ओळख फक्त इतकीच आहे?”
दुसऱ्या दिवशी ती शमिकाला भेटायला गेली.
“शमिका, मला काहीतरी करायचंय. पण मी अडकलेय.”
शमिकाने तिच्या डोळ्यांत पाहिलं.
“शर्वरी, मुक्तता बाहेरून मिळत नाही, ती आतून शोधावी लागते.”
शर्वरीला ते पटत होतं. ती घरी आली आणि एका वहीत तिने लिहायला सुरुवात केली.
पहिल्या ओळी होत्या—”स्त्रीला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर तिने स्वतःसाठी उभं राहायलाच हवं.”
हळूहळू तिने लिहायला सुरुवात केली. शमिकाच्या मदतीने तिने एका वृत्तपत्रात लेखनाचं काम सुरू केलं. सुरुवातीला घरात विरोध झाला.
“सूनबाईला आता नोकरी करायचीय? आमच्या घरात बायकांनी असलं काही केलं नाही!” सासू म्हणाली.
राजू नाराज झाला, “शर्वरी, तुला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?”
पण शर्वरी या वेळी गप्प बसली नाही.
“राजू, हे फक्त काम नाही, ही माझी ओळख आहे.”
राजूला तिचा हा बदल समजला नाही, पण ती मागे हटली नाही.
एका संध्याकाळी, ती चहा घेत असताना, तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं.
“तुमचा लेख आजच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे!”
शर्वरीने मोबाईल हातात घेतला. तिचा पहिला प्रकाशित लेख!
तिने पहिला घोट घेतला आणि गॅलरीत उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर मुक्ततेचं हसू उमटलं. ती अजूनही त्याच घरात होती, त्याच जबाबदाऱ्या होत्या. पण आता ती मुकपणे सहन करत नव्हती—ती मोकळेपणाने जगत होती. तिच्या मनात विचार आले. स्त्रीची मुक्तता बाहेरून मिळत नाही, ती आतून शोधावी लागते. त्या दिवसानंतर शर्वरी दररोज लिहायला लागली. सकाळी सगळ्या घरकामांनंतर थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायची. तो वेळ तिच्या लेखणीचा असायचा. तिची वही, तिचं पेन, आणि तिच्या मनात साचलेले विचार.
एक दिवस ती शमिकाला म्हणाली, “मी एक स्त्रियांच्या संघर्षावर आधारित स्तंभ लिहायचा विचार करतेय.” “छान! नाव काय ठेवणार?” “‘मौनातला आवाज’… कारण कितीतरी बायका बोलत नाहीत, पण त्यांच्या आत खूप काही साचलेलं असतं.”
शमिकाने तिला मिठी मारली. “शर्वरी, तुझं लिहिणं म्हणजे फक्त शब्द नाहीत – तो आवाज आहे, जो अनेक जणींचं प्रतिनिधित्व करतो.”
एका रविवारी सकाळी…शर्वरी नाश्ता करत होती, तेव्हा तिची सासू टी.व्ही.वर काहीतरी पाहत होती. अचानक एक बातमी आली—”शहरातल्या एका महिला पत्रकाराने बालविवाह रोखण्यासाठी चालवलेल्या मोहिमेला यश…”
शर्वरी चकीत झाली. ती बातमी तिच्या एका लेखावर आधारित होती. तिच्या शब्दांनी काहीतरी बदल घडवला होता. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याच वेळी तिच्या सासूबाईंनी विचारलं,
“तुझं नाव घेतलं का ग बातमीत?”
“नाही… पण माझं काम होतं त्यात.”
सासूबाई थोड्याशा चकित झाल्या, पण काही बोलल्या नाहीत. त्या फक्त तिच्याकडे पाहत राहिल्या. काही दिवसांनंतर राजूची बदली झाली. काही महिन्यांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं.
“शर्वरी, तू पण चल माझ्यासोबत काही महिन्यांसाठी?” “माझं काम इथे सुरू आहे. मी राहते. माझ्या लेखनाचं काम थांबवू शकत नाही.”
राजूने भुवया उंचावल्या.
“आता लेखन इतकं महत्त्वाचं झालंय?”
“हो. कारण ते मला स्वतःला जपायला शिकवतं.”
राजू गप्प झाला. त्याला शर्वरी आता पूर्वीसारखी राहिलेली नव्हती. पण तिच्या डोळ्यांत एक नवा ठामपणा होता. आणि कधीकधी ती शांत शक्तीही सर्वात प्रभावी असते.
एका कार्यक्रमासाठी शर्वरीला निमंत्रण आलं.
“लेखनातून सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या महिलेसाठी विशेष पुरस्कार.”
ती स्टेजवर गेली. तिच्या हातात माईक आला. ती म्हणाली,
“मी फक्त लिहित गेले. पण माझ्या लेखणीत अनेक आवाज होते—माझे, तुमचे, आपल्या सगळ्यांचे. आणि हे शक्य झालं कारण मी स्वतःला हरु दिलं नाही.”
प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. शमिकाचे डोळे भरून आले. घरातही कधी सासूबाई तिच्या लेखांचं कौतुक करू लागल्या.
“काल तुझा लेख वाचला. अगदी मनाला भिडला गं. आपल्या शेजारच्या सविताला मी सांगितलं, ‘आमच्या शर्वरीचं लिहिलेलं वाच.’”
राजू जरी अजून पूर्णपणे बदललेला नव्हता, तरी आता त्याला शर्वरीचं महत्त्व जाणवत होतं. एका रात्री त्याने विचारलं, “तू एवढं सगळं करतेस, दमतेस का?” शर्वरी हसली, “हो, दमते. पण हे दमणं माझं आहे. माझ्या अस्तित्वासाठी आहे.”
त्या दिवशी शर्वरी एका मुलाखतीसाठी गेली होती. एक नवोदित लेखिका तिला विचारत होती,
“तुमच्यासाठी यश म्हणजे काय?”
शर्वरीने उत्तर दिलं,
“यश म्हणजे इतरांनी दिलेल्या चौकटी मोडून, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अर्थाने जगणं. मुक्तता बाहेरून मिळत नाही, ती आपल्यातच असते – फक्त तिला ओळखायची आणि स्वीकारायची गरज असते.”
