कोरोना, जनगणना, बीएलओ
अन् निवडणुकीची धावाधाव,
शिक्षकांच्या खांद्यावर आहे
आता प्रत्येक गाव.
पटसंख्या वाढवा, गळती थांबवा,
शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवा.
शिकवणं बाजूला, कागदांचा ढीग,
तरीही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर
हसू फुलवतो अगदी नीट.
काम नाही झालं तर नोटिसांचा मारा,
कारवाईची भाषा अन् दबाव सारा
रजा, सुट्ट्या आयुष्याचे रंग,
त्यांच्याशी कुणालाच नसतो संबंध.
स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाला विराम,
कर्तव्यापुढेच असतो त्याचा प्रणाम.
मनात असतात वेदना अनंत
तरीही चित्त ठेवावे लागते शांत
वैयक्तिक अडचणींची कुणालाही
न लागू देता चाहूल,
कर्तव्य निभावतो तो
अखंड अन् अविरत.
शिक्षक आहे तरी कोण
नक्की सांगा,
विद्यार्थी घडवताना कधी
स्वतःलाच हरवून बघा.
