
नवीन आयुष्याची स्वप्नं उरात घेऊन, समीर आणि वैदेही काश्मीरच्या भव्य सौंदर्याकडे निघाले होते. नुकतीच त्यांची लग्नगाठ बांधली होती, आणि त्यांना वाटत होतं, या दिवसांत सगळं जग विसरायचंय, फक्त एकमेकांत हरवायचंय.
हवेत थोडासा गारवा होता. विमानतळावर पाय ठेवताच समीरने वैदेहीचा हात घट्ट पकडला. दोघांच्याही डोळ्यात स्वप्नं चमकत होती. एका टुरिस्ट कारमध्ये बसून ते त्यांच्या हॉटेलकडे निघाले. वाटेत सुंदर चिलगोज्याची झाडं, बर्फाच्या धुळीने झाकलेली रस्त्यांच्या कडा, आणि लांबून दिसणारी बर्फाच्छादित पर्वतराजी. सगळं स्वप्नवत होतं.
हॉटेलच्या खिडकीतून दिसणारा डल लेक जणू त्यांच्या प्रेमाचं शांत प्रतिबिंबच होतं.
रात्रीच्या जेवणात गरम कहवा घेताना वैदेही म्हणाली,
“किती सुंदर आहे ना इथलं सगळं? वाटतंय, काळ इथंच थांबून रहावा!”
समीर हसून म्हणाला,
“काही काळापुरतं का होईना, आपण आपलं जग इथेच थांबवूया.”
दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं. शिकाऱ्यात बसायचं. लाकडी शिकाऱ्याला रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं. पाण्यावर अलगद सरकताना डल लेकचं सौंदर्य त्यांच्या मनात हळूवार साठवलं जात होतं. सूर्यास्ताच्या वेळेस पाणी केशरी झालं होतं, आणि समीरने हातात घेतलेला गुलाब, वैदेहीच्या केसांमध्ये मोकळेपणाने माळला. त्या संध्याकाळी दोघांनी शिकाऱ्याच्या घरातच विश्रांती घेतली. पाण्याच्या लहरींच्या आवाजात छान झोप लागत होती. तिसऱ्या दिवशी ते गुलमर्गला गेले. केबल कारने वर चढताना, खाली पसरलेली पांढरी चादर पाहून वैदेही भारावली.
“हे असं काही मी स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं,”
ती म्हणाली. दोघांनी हातात हात गुंफून भरपूर आनंद घेतला. बर्फात खेळले, स्नोबॉल फेकले, आणि थोडंसं मौजमजा करत लहान मुलांसारखं हसले. थंडीमुळे दोघेही गारठले होते, पण त्यांच्या हसण्याने वातावरणात ऊब निर्माण झाली होती.
चौथ्या दिवशी त्यांनी ठरवलं, आज पर्यटकांसारखं नाही, तर खरंखुरं काश्मीर अनुभवायचं. एका स्थानिक कुटुंबाने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. घरातला सुगंध, कश्मीरी दम आलू, नंदरु यखनी, आणि घरगुती कहवा. संवाद जरी फारसा चालला नाही तरी त्यांच्या डोळ्यांतील आपुलकी पुरेशी होती. समीर आणि वैदेही थोडे लोकल लोकांमध्ये रुळले. दोघांच्याही मनात काश्मीरची माणसं, त्यांची साधी स्वच्छ मने खोलवर उतरली.
पाचव्या दिवशी श्रीनगरच्या बाजारात हिंडताना किती खरेदी करावी आणि किती नको असं झालं होतं. वैदेहीने तर माहेरच्या आणि सासरच्या सर्वांसाठी काश्मीरची आठवण म्हणून काही ना काही घेतले होते. रस्त्यावर सैनिकांची वर्दळ होती. बाजार गजबजलेला होता. काही दुकाने अर्धवट उघडी तर काही बंद होती. समीर वैदेही कडे पाहून कुजबुजला,
“भरपूर खरेदी झाली मला आता कंटाळा आला आहे. आपण लवकर परत जाऊया का?”
वैदेही त्याचा हा खट्याळपणा ओळखून होती. त्यांनी अजून थोडी खरेदी केली. हाताने विणलेली शाल, स्वेटर, ड्राय फ्रूट आणि मग ते हॉटेलकडे परतले. मनात गुलाबी स्वप्नांची मैफल सजू लागली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच हवेत एक वेगळीच बेचैनी होती. टीव्हीवर न्यूज चॅनल्समध्ये बातम्या चालू होत्या.
“श्रीनगरच्या मुख्य बाजारात हल्ला, काही लोक जखमी.”
समीर आणि वैदेही घाबरले. ते हॉटेल सोडून विमानतळावर पोहोचायचं असं त्यांनी ठरवलं. पण बाहेरची परिस्थिती बिघडलेली होती. हॉटेल व्यवस्थापकाने सांगितलं,
“आज बाहेर पडणं धोकादायक आहे.”
वैदेही खिडकीतून बाहेर पाहात होती. सैनिक, घाबरलेले लोक आणि चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा. कसून होणारी तपासणी.
शेवटी हॉटेलमध्येच सुरक्षित थांबणं भाग पडलं. समीरने तिचा हात धरून आश्वासक हसण्याचा प्रयत्न केला,
“आपण सोबत आहोत, हे महत्त्वाचे आहे.”
वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तीही हसली. बाहेरचा आवाज थोडा शांत झाला. सैन्य दलाची गाडी त्यांच्या हॉटेलसमोर थांबली. हॉटेल व्यवस्थापकाने सूचना दिली.
“आमच्या सोबत चला. एका सुरक्षित मार्गाने विमानतळाकडे जायचं आहे.”
दोघंही एकमेकांचा हात घट्ट धरून सुरक्षित गाडीत बसले.
विमानाच्या सुरक्षित आसनावर बसल्यावर समीरने मागे वळून काश्मीरकडे पाहिलं. ते सौंदर्य अजूनही होतेच, पण आता त्यात एक वेदना मिसळली होती. वैदेहीने अलगद त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. दोघांचं प्रेम, त्यांचा विश्वास, त्या दिवसांमधून अजून गहिरा झाला होता. संकटाच्या सावलीतही ते एकमेकांचा आधार झाले होते.
काश्मीरने त्यांना केवळ निसर्गाचं सौंदर्य दिलं नव्हतं, तर प्रेमाची खरी कसोटी शिकवली होती. एकमेकासाठी असलेली निःस्वार्थ भावना. हातात हात गुंफून, डोळ्यातून क्षीण हसू उमटवत त्यांनी निर्णय घेतला.
“आयुष्य कितीही अस्थिर असो, आपण मात्र कायम एकत्र राहायचं.”
आणि विमान आकाशात उंच भरारी घेत राहिलं, त्यांच्या आठवणींसोबत…
(ही कथा काल्पनिक आहे तिच्या कुठल्याही सत्य परिस्थितीत घटनेशी संबंध नाही.)